एक फसलेला दिवस
कल्याण हैदराबाद परतीचा प्रवास
दिनांक 28 जुलै 2019
आदल्या दिवशीच्या महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकारानंतर आम्ही हादरलो होतो. बातम्यांमध्ये उगाच काहीतरी वाढवून सांगितले जात होतं. वाटलं उगाच काहीतरी सांगत आहेत.. असं काही नसेल पण पुढे काय वाढून ठेवलं होतं याची आम्हाला काय कल्पना...
आदल्या दिवशी रात्रीपासून ट्रेनचं स्टेटस चेक करणं सुरू झालं... कोणाक एक्सप्रेस, हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस, 'लाइव रनिंग स्टेटस' मध्ये टाकून पाहणं सूरू केलं... प्रत्येक ट्रेनचं स्टेटस दाखवत होतं किती बदलापूरला येऊन तिथेच थांबलेली आहे.. काहीच कळेना आमच्या ट्रेनचं स्टेटस काय असेल? काय माहिती? रात्री मोबाईलची 'एसएमएस'ची रिंग वाजली पण आम्ही गाढ झोपेत होतो... त्यामुळे रेल्वेकडून आलेला तो 'एस एम एस' पाहता आला नाही हा एसएमएस खालील प्रमाणे होता.
T NO 17031 EX CSMT OF DT 28/7/19(CSMT-HYB EXP)WILL WORK EX PUNE AND CANCELLED BETWEEN CSMT-PUNE. CONTACT 139 OR ENQUIRY COUNTER.
सकाळी उठल्यावर तो एसेमेस पाहून पायाखालची जमीन सरकली, डोळ्यासमोर काजवे चमकले आणि काय काय झालं माहित नाही..आमची ट्रेन आणि रद्द..? हैदराबादला जाणं जरुरीचं होतं पण आता करणार काय काही समजेना...
१३९ वर फोन झाला, हे बटण दाबा ते बटण दाबा, काही उपयोग नाही, ध्वनीमुद्रीत ध्वनी ऐकून फोन बंद झाला..
पण त्यातल्या त्यात आशेचा एक छोटासा किरण होता... ही ट्रेन मुंबई ते पुणे पर्यंत रद्द होती पण पुण्यापासून पुढे ठरलेल्या वेळेवर निघणार आहे हे कळल्यावर पुण्याला जायचा मार्ग शोधणे सुरु झाले... अर्थात बदलापूर ते कर्जत यामधला रेल्वेचा रूळ पाण्याखाली गेलेला असल्यामुळे कूठल्याही ट्रेनने पुण्याला जाणे जवळजवळ अशक्य होते... शेवटी आपण रेल्वे एवजी इतर मार्गाने पुण्याला जावे असा विचार पुढे आला...
पर्याय क्रमांक १, विमान... अर्थातच खिश्यात हात गेला... आणखी मान आपोआप नकारात्मक हलली.
पर्याय क्रमांक २, आधी ठाण्याला रेल्वेने जाणे व तिथून कुठलीही एसटी किंवा बस पकडून पुण्याला जाणे. जरासा त्रासदायक, राजनदादाच्या मते बऱ्याच गाड्या पुण्याहून रिशेड्यूल केल्याने गर्दी असणार हे आलंच.
पर्याय क्रमांक ३, ओला आऊटस्टेशन गाडी बुक करून पुण्याला सरळ जाणे आणी मग आमचीच गाडी पकडणे..
यातला पर्याय क्रमांक ३ पसंत केला. हा मार्ग थोडा महाग असला तरी सोयीस्कर होता आणि व्यवस्थित आपण पुण्याला पोहोचू याची खात्री वाटत होती... गाडी रद्द झाली पण तिकीट नाही अशी पळवाट सांगून टिसीला गुंडाळता येईल...
झालं ओला बुक झाली त्याला सकाळी अकराची वेळ दिली... तर हा साडेदहालाच येऊन उभा ठाकला... माझा जीव भांड्यात पडला.. चला पुण्यापर्यंत जायची सोय झाली... तयारी वगैरे करून निघायला सकाळी साडेअकरा वाजले.. मुंबई ते कल्याण मोठ्या ट्रॅफिकमधून मुश्किलीने मूंबई पुणे महामार्गावर पोहोचयाला एक तास लागला...
पण अजून बराच वेळ असल्याने मी आशावादी होतो...
वेळेवर पोहोचू की नाही याची मनात असलेली धाकधूक, पाऊस रस्त्यामध्ये पडून पाणी साचून किंवा रस्त्यात काही त्रास होईल का ही शंका... आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण... पण त्याचा आनंद घेता येत नव्हता..
मस्त गुलाबी थंडी, फेसाळणारे धबधबे, मध्ये येणारी पावसाची एक हलकीशी सर, आरव आणी अवनी वातावरण एन्जॉय करत होते पण माझ्या डोक्यात चाललेल्या चलबिचलमुळे काही केल्या मला प्रवासाची मजा येईना..
पूढे टोल नाका पार केल्यानंतर गाडी सुसाट वाऱ्याच्या वेगाने पळू लागली आणि पुण्यापर्यंतचं दीडशे किलोमीटरचं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. आता कसंही करून आरामात संध्याकाळी साडेचारपर्यंत पोहचतो आपण अशी खात्री होती...
इतर वेगवान गाड्यांची स्पर्धा करत आम्ही जवळपास शंभर एक किलोमीटर अंतर पार केलं असेल तेवढ्यात त्या ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली गाडीतून उतरला आणि म्हणाला "टायर पंक्चर हो गया है"...😨
घड्याळात अडीच वाजले होते, मनामध्ये धस्स झालं.. त्या गुलाबी थंडीतही घाम फुटला, मनात म्हटलं झालं आता काय आपण गाडी पकडत नाही....
"साब, चींता मत करो मेरे पास स्टेपनी है"
तसा अजूनही काही वेळ शिल्लक होता, त्यामुळे मी विचार केला जरी आपल्याला अजून अर्धा तास लागला तरी काही हरकत नाही.. आपल्याला अजून वेळ आहे गाडी पकडायला...
पावसाची हलकी सर येऊन गेली म्हणून मी गाडीत बसलो सोबत आणलेला नाश्ता गाडीत संपवला... न जाणो नंतर खायला वेळ मिळेल की नाही....
अर्ध्या तासाच्या मारामारीनंतर त्याने गाडीचं पुढचं चाक बदललं आणि मला म्हणाला, चलते है लेकिन अभी इस टायरमे हवा थोडी कम है... मी म्हटलं "हवा भरने केलीये दुकान कहा मिलेगा, "आगे टोल नाकेके बाद दूकान है, ऊंहा भर सकते हैं"
म्हटलं चलो...
आम्ही निघालो गाडी घेऊन पाच किलोमीटर गेली असेल तेवढ्यात नवीन टाकलेल्या टायर मधून पुन्हा आवाज येऊ लागला गाडी बाजूला घेतली बघतो तर स्टेपनीचे बारा वाजलेले... अगदी टायरची पावडर झालेली... आणखी भरीला जोराचा धोधो पाऊस सूरू झालेला....
झालं.. आता तर पोहोचणं अगदी अशक्यच आहे... गाडीत दोन टायर.. आणी दोन्ही टायर पंक्चर... सगळ्या गाड्या भरधाव वेगाने येताहेत आणि निघून जाताहेत.. जोरात पाऊस आल्यामुळे गाडीच्या बाहेर पडता येईना.. त्या महामार्गावर कोणीही थांबत नाही... अशा ठिकाणी आम्ही अडकून पडलो होतो...
भर पावसात छत्री घेऊन बाहेर उभा राहून प्रत्येक येणाऱ्या इकडे अंगठा वर करून बघत आणि कोणी आपल्याला लिफ्ट देईल या आशेवर मी उगाचच होतो..कारण तोच एक पर्याय सूचत होता.... शर्ट घामाने आणी पॅन्ट आडव्यातीडव्या मारणाऱ्या पावसाने चिंब भिजून गेली... दूसरी ओला कॅब करावी तर, डेस्टीनेशन नाॅट ऐवेलेबल म्हणे
दोन पूरूष बाहेर उभे आहेत तेंव्हा "हे कुटुंब आहे कोणी दरोडेखोर किंवा लूबाडण्याचा काही प्रकार नाहीये" असं दाखवण्यासाठी ॠजूता पण माझ्याबरोबर पावसात भिजत बाहेर आली.. तरी कोण थांबायला तयार नाही... मी मनात म्हटलं आता गाडी टोचन करून घेऊन न्यायचाच पर्याय उरलाय, पुण्यात आज राहून मग उद्या जनशताब्दी तिकीट काढूया...
गाडीची प्रस्थान वेळ १६.३५
घड्याळातली वेळ १५.००
उर्वरीत किलोमीटर ६५ अंदाजे..
आता माझ्या सगळ्या आशा मावळल्या होत्या तेवढ्यात एक टॅक्सी समोर येऊन उभी राहिली मी त्याच्याकडे धावतच गेलो, म्हणाला बसा गाडीत मी सोडतो तुम्हाला... शेवटी एक मराठी माणूसच उपयोगी आला... तो माणूस अक्षरशः देवासारखा धावून आल्यासारखं वाटलं.. पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या.. घड्याळ्यात सव्वातीन होतं होते.. थोडासाच वेळ शिल्लक होता... जर या पुढे ट्रॅफिक लागला नाही आणी आमचं दुर्दैव अजून आड आलं नाही तर कदाचित शेवटच्या क्षणी गाडी पकण्याची शक्यता निर्माण झाली होती...
ओलाच्या ड्रायव्हर बरोबर पैशाची बोलणी करून आम्ही नवीन गाडीमध्ये बसलो.. पुण्यापर्यंत ओलाचे अठराशे रुपये ठरले होते... आता त्यांने मध्येच रस्त्यात सोडलं... नवीन टॅक्सीवाला हजार रुपये मागू लागला... घासाघीस करण्यासाठीचा वेळ माझ्याकडे नव्हता.... त्या मुळे मी या ओलावाल्याला फक्त आठशे दिले.. म्हटलं "हिशोब पूरा हो गया, टोटल आपको अठरा सौ रुपये दिखा रहा है, हजार मे उसको दुंगा बाकी ८०० आपको दुंगा" , त्याने ओला वाल्यांना फोन केला पण माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी लगेच त्याच्या हातावर आठशे रुपये टेकून ताबडतोब नवीन गाडीत बसलो...
मग मघाचं खेळीमेळीचं वातावरण आता काळजीच्या वातावरणामध्ये बदललेलं... आम्ही घड्याळाचे काटे बघत प्रवासाला सुरुवात केली.. सव्वातीन ते सव्वा चार असा एक तासाचा प्रवास अपेक्षित होता... जर पुढे कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नाही तर गाडी आपल्याला मिळू शकेल अशी पूसटशी आशा होती... सुदैवाने यापुढचा प्रवास व्यवस्थित झाला आणि आम्ही अगदी साडेचारच्या सुमारास स्टेशनवरती उरलेले पैसे ड्रायव्हरला देऊन सामानासकट प्लॅटफॉर्म नंबर चारसाठी पळतच निघालो...
गाडीची अनाउन्समेंट झाली होती तिचा प्रस्थान वेळ १६.३५ होतं.. स्टेशन पार करून गाडीपर्यंत पोचचायला आम्हाला १६.३४ झाले.
गाडीत पाऊल ठेवून सामानाची स्थिरस्थावर करेपर्यंत गाडी सुटली. हिच ती एक ते दोन मिनिटे आमचं भविष्य ठरवणारी...
पुढचा पल्ला टिसीला सामोरे जाणे आणि दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची भ्रांत सोडवणे हा होता.
टिसी आला त्याला आम्ही परत सगळं समजावून सांगितलं... तो म्हणे त्याला मुंबईवरून कुठलाही चार्ट मिळाला नाहीये त्यामुळे तो आमच्या तिकिटाची शहानिशा कशी करणार... त्यानं नावं पीएनआर नंबर लिहून घेतला, म्हणाला पुढच्या स्टेशनवर मी चार्ट मागवतो आणि तुम्हाला सांगतो... मनात म्हटलं काय करायचं ते कर आम्ही काय आता गाडीतून उतरत नाही...
"हे काय उगाच माझं काम वाढलं" असं म्हणत तो चरफडत गेला...
गाडीने तोपर्यंत वेग घेतला होता आणि दोन-चार स्टेशन मागे सोडली होती... आमचं दुष्टचक्र आता संपलं होतं आणि पुढच्या प्रत्येक स्टेशनवर काही ना काहीतरी खायला घेत आम्ही पुढच्या मार्गाला लागलो होतो...
समाप्त...