त्रिलोकी नाथ पंत.
हैदराबादची अनोळखी जागा, नविन कंपनी आणी नविन माणसे, कुणालाही ओळखत नाही, अश्या ठिकाणी ४ महीने एका छोट्याश्या मी खोलीत एकट्याने कसे काढले याच अजुन ही आश्चर्य वाटत आल आहे मला. कंपनीत मोठी घडामोड होणार होती. बऱ्याच जणांची ट्रान्सफर झाली होती आणी त्रिलोकी चा रूम पार्टनर अहमदाबाद ला चालला होता. त्यामुले मी तब्बल ४ महिन्यानी माणसात आलो होतो आणी त्रिलोकी सोबत रहायला बी इन आर अपार्टमेन्ट मध्ये शिफ्ट झालो होतो. त्रिलोकी नाथ पन्त, एक अजब समीकरण, सहा फूटाची उंच शरीरयष्टि, वजन जेमतेम पन्नास पर्यंत असाव. लांबुन पहाताना कपड्यांच्या आत कदाचित देह असावा असा वाटे पर्यंतच. बोलण्यात कुणालाही हार जाइल तर शप्पथ. वागण मात्र बरोबर उलट, बोले तैसा चाले त्याची वन्दावी पाऊले, च्या कल्पनांना छेद देणारा. त्याच्या साठी काही नवीन म्हण तयार करावी लागेल, बोले तैसे चाले त्याला त्रिलोकी कैसे म्हणावे.
" मुझे तो साफ़ साफाई बहोत पसंद है " म्हणेल आणी दिवसेंदिवस आंघोळ करणार नाही. " शुद्ध शाकाहारी खाना ही जीवन की गुरु किल्ली ", हे वाक्य हवेत विरताच चिकन घरात हजर होइल. " चलो यार, आज घुमने चलते है " अस म्हटल की समजाव की आज आराम करण्याचा मुड़ आहे. मी तर शेवटी त्याच्या बोलण्याचा उलट अर्थ लावून घेण्याची सवयच लावून घेतली होती. तो म्हणेल तस दुसरयाने कराव त्याने नाही. मी चिकन आणल की म्हणे " घर में ऐसे चिकन बनाना ठीक नहीं, पता है मेरे सपने में कल गंगा नदी आई थी, क्या भयंकर बाढ़ आई थी उसे, नाराज थी मुझपर ". " नहीं खाना है तो तू मत खा ", मी म्हटल. पुढच्याच दोन दिवसांनी तोच स्वत चिकन घेवून आला. मी त्याला म्हटल " अब गंगा नदी शांत है क्या, बाढ़ खत्म हो गयी लगता है, ज्यादा नुक्सान नहीं हुआ ना ". मला शांत बसवतय.
जेवण बनवण्यात हातखंडा, पण साहित्य मात्र राजे शाही हव बर का. गोडे तेल, ६० रु वालं छे, अजिबात नाही, " कभी शेर को घास खाते देखा है ? " अस म्हणुन मला चुप करणार. 'अमूल'च्या साजुक तुपात जेवण बनवणार, तांदुळ हवे तर ते बासमती, दिल्ली राईसच पाहिजे बाबा.काय म्हणता नुसती तुरीची डाळ... नाहीबा, उडीद, चणाडाळ, मुग, तुरडाळ, मसूर ह्या पंच डाळीची चिकट आमटी रोज पचवावी लागे. तुप, क्रीम, काजू बेदाणे, मी म्हणे असे भारी जिन्नस घेवून कसही जेवण बनवल तरी ते छानच लागणार त्यात विशेष काय ते.
जेवण बनवायची पद्धत एकदम भारी, माझी स्वयंपाक घरातली लुडबुड अजिबात खपणार नाही, मदत तर दूर राहिली, अर्थात माझ्या ते पथ्यावरच पडायच. मला आराम मिळायचा. समजा रात्री ९ ला जेवायाच आहे तर हे महाशय साडे आठ पर्यंत काही करणार नाही. मग अचानक अंगात वारं शिरल्यागत तडक कामाला लागणार. आधी डाळ बनवायची आणी मग भाताचा कुकर लावायचा. तुपाची फोडणी, कांदा टोमेटो हातानेच हातावरच कापून तुपात तडतडवणार, हे करताना म्हणणार " प्याज तो एक जैसा काटना चाहिए ", मी ह्याचा अर्थ नेहमी प्रमाणे उलट घेतो. हळद, मिर्चीपुड, मसाले, मीठ, वगेरे घालून कुकर लावला की त्याला आठवणार की कपडे धुवायचे आहेत पण हे काम काय आत्ताच करायला हवे ? कपडे धुण्याचा आवाज रात्रीच्या काळोखात घुमला आणी जोडीला कुकर ने ५ वेळा बोलावल की साबण्या हाताने शिट्टी ओढून काढणार, थोडा डाळीचा नेवेद्य भिंतीना वगेरे देणार, डाळ दुसऱ्या भांड्यात काढून त्याच कुकरमद्ये तांदुळ, अंदाजे, घेवून, धुवून त्यात ४ बोटं बुडवून पाणी घालणार. कुकर गैस वर आणी त्याखाली गैस चा नोब अगदी बाहेर येइपर्यंत फिरवून, त्याचा वणवा करणार. हे करुन पळणार बाथरूम मध्ये आंघोळीला. मोठ्याने " हर गंगे, भागीरथी ..." म्हणत अख्खा माळा गाजवणार. ५ मिनिटात कावळ्याची आंघोळ करून, 'भाताने मी शिजलो बर का' अस ३ शिट्ट्या मारून सांगितल की ओल्या हाताने कुकर ची वाफ काढून भाताची सुटका करणार. मग पुढच्या ५ मिनिटात देवाची पूजा... रोज त्याची ही अशी, कोंबडी कशी मागे कुणी लागल्यावर पंख फडफडवत गाव भर नाचते तशी, कसरत पाहून आम्ही जेवायला बसायचो. अर्थात नऊ चे सव्वा नऊ व्हायचे आणी जेवण पोटात जायच.
काही असल तरी माझ्या कठिन, खडतर पहिल्या ४ महिन्याच्या त्रासातून सुटका करणार्या ह्या त्रिलोकीला मी कधीही विसरु शकणार नाही. माझ त्या काळात कमी झालेल वजन वाढवण्यात त्याच्या हातच्या तुपातल्या डाळीचा मोलाचा वाटा होता....
मंगळवार, ७ जुलै, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा